राष्ट्रीयविशेष

राज्यात शिरूरचा ‘हरित’ डंका; साडेपाच कोटींचा मानाचा तुरा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}पर्यावरण संवर्धनाच्या आघाडीवर शिरूरने राज्यात आपला ठसा उमटवला आहे. शिरूर नगरपरिषद हिने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. त्यात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी ४ कोटी आणि ‘भूमी’ थीमॅटिक घटकातील अव्वल कामगिरीबद्दल १.५० कोटींचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू आहे. पंचमहाभूत—जल, अग्नी, आकाश, वायू आणि भूमी—या संकल्पनेवर आधारित उपक्रमांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांची पर्यावरणीय कामगिरी तपासली जाते. १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत पार पडलेल्या ५.० टप्प्यात राज्यातील २८,३१७ संस्थांनी सहभाग नोंदवला होता.
भूमी घटकात ठोस कामगिरी
शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, बायो-मेडिकल कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी, दृश्यमान सार्वजनिक डिस्प्लेसह वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र, फटाके बंदी जनजागृती, तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणी अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.  काळात जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, एलईडी पथदिव्यांचा वापर आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन यामुळे शहराची पर्यावरणीय पातळी उंचावली.
लोकसहभागाचे बळ
या यशामध्ये खासदार अमोल कोल्हे, आमदार माऊली कटके, नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, उपनगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, आजी-माजी सदस्य, मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, नगर रचनाकार पंकज काकड, अभियंता समाधान मुंगसे, तेजस शिंदे, रत्नदीप पालके, विजय आंधळे, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, कर निरीक्षक माधव गाजरे, चाकणे, शितल काळे, शहर समन्वयक प्राची वाखारे तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता मुकादम, सफाई कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी , शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि शिरूर शहरातील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला गती मिळाली.
नागरिकांचा सक्रिय सहभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचे समन्वयित प्रयत्न आणि पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा मानाचा तुरा शिरूर नगरपरिषदेच्या शिरपेचात रोवला गेला आहे.
पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासन-नागरिक यांचा समन्वय यामुळे शिरूरने राज्यात मानाचा तुरा पटकावला आहे. शहराच्या ‘हरित’ वाटचालीला या पारितोषिकाने नवी ऊर्जा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button