शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून रंगणाऱ्या श्री शिवमहापुराण कथेमुळे शिरूर नगरीत सध्या अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला आहे. दि. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत रामलिंग रोडवरील भव्य स्थळी दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा रंगत असून, आज कथेचा पाचवा दिवस आहे.
कथेदरम्यान आचार्य मिश्रा यांनी भाविकांना प्रेरित करताना सांगितले, “आर्थिक उन्नतीसोबतच अध्यात्मिक उन्नती अत्यंत महत्त्वाची आहे. पैसे कमवा, पण त्याचबरोबर दुवा आणि आशीर्वादही कमवा. भुकेल्याला अन्न द्या, गरजूंच्या कामी या, अडचणीत असणाऱ्याला मदत करा – त्यातून मिळणारा आशीर्वाद महत्वाचा आहे.
भारतभूमी ही साधू-संतांची भूमी असल्याचे सांगताना त्यांनी प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख केला. चांगली कर्म करा. मनुष्याच्या पीडेचे कारण त्याची कर्मेच असतात. म्हणून सद्वर्तन आणि सेवा हा जीवनाचा मूलमंत्र ठेवा,” असे ते म्हणाले.
oplus_131074
भगवान शंकर तेव्हाच प्रसन्न होतात, जेव्हा आपण दुसऱ्याचे दुःख हलके करण्यासाठी पुढाकार घेतो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा, रुग्णांना आधार द्या, आई-वडील व ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, असे आवाहन केले. महामृत्युंजय मंत्र काळाच्या भीतीपासून दूर करतो आणि प्रत्येक क्षणी शिवशंकरांचे स्मरण मनाला स्थैर्य देते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले की रुद्राक्ष मुळे ऊर्जा व कवच प्राप्त होते. रुद्राक्षाचे महत्व व त्या संदर्भातील अधिक संशोधन करण्याकरता सिरोह येथे रुद्राक्ष संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
प्रत्येकाने कमीत कमी एक वृक्ष लावून पृथ्वीला हिरवेगार करावे असेही आवाहन त्यांनी केले.
जो भाविक विश्वासाने श्रद्धेने शिव शंकराची आराधना करतो त्याची पूजा करतो भजन करतो त्यास शिवशंकर आशीर्वाद देतात याप्रसंगी त्यांनी पार्वती व शंकर यांच्या विवाह सोहळ्याचे वर्णन केले
या वेळी “दिगंबरा श्रीपाद वल्लभ” तसेच “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
या अध्यात्मिक सोहळ्यास उद्योगपती प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल, दिनाभाभी धारिवाल, साक्षी धारिवाल, सुनील धाडीवाल, तसेच माजी नगरसेवक विजय दुगड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूरमध्ये सुरू असलेल्या या भव्य शिवमहापुराण कथेमुळे श्रद्धा, सेवा आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. तणावग्रस्त जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मकतेचा नवा किरण या सोहळ्याने भक्तांच्या मनात प्रज्वलित केला आहे.
“दुसऱ्याचे दुःख दूर करा – महादेव तुमच्यावर कृपा करतील,” या संदेशाने शिरूरकरांच्या हृदयात अध्यात्मिक जागृतीची ज्योत प्रज्वलित झाली आहे.हर हर महादेव!