Uncategorizedविशेष


येथिल मंदिरा संदर्भात माहिती देताना मुख्य विश्वस्त विजयकुमार गोरे पाटील यांनी सांगितले की येथे देवीची दोन मंदिरे आहेत एक नवी येमाई व दुसरी जुनी येमाई . पहिल्या येमाई बाबत देवीचा संदर्भात आख्यायीका सांगितली जाते की श्रीराम दंडकारण्यातून जात असताना सीतेचा विरहाने व्याकूळ झाले असताना आकाशमार्गे शंकर पार्वती चालली होती. पार्वतीचे श्रीरामाकडे लक्ष गेले. शंकराचे ही त्याकडे त्यानी लक्ष वेधले. पार्वतीमातेने सीतामाईचे रूप घेवून श्रीरामाची सत्वपरीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला. पार्वती सीतामाईचे रूप घेवून तिथे आली. रावणाने आपली धास्ती घेवून सीतामाईला सोडून दिल्याचा बहाना पार्वतीमातेने केला. तेव्हा अंतर्ज्ञानाने श्रीरामाने पार्वतीला ओळखले.
आणि शंकराला माझा नमस्कार सांगा असा निरोप धाडला. श्रीरामाने दिलेल्या उत्तराने पार्वती माता अवाक होवून अदृश्य झाली. ज्याठिकाणी पार्वती अदृश्य झाली तिथे एक तांदळा निर्माण झाला. श्रीराम त्या तांदळाची पूजा करून पुढे मार्गस्थ झाले. त्याच ठिकाणी गुरे राखणारी मुले गुरे चरण्यासाठी घेवून आल्यावर नित्यनेमाने देवीचे दर्शन घ्यायचे एक दिवस देवी प्रकट झाली व प्रसन्न होवून म्हणाली की तुला हव ते माग तेव्हा एका गुरख्याने स्वंत;ला शक्ती मागितली तर दुसराने माझ्या घरी चल म्हणून आग्रह धरला. त्यावेळी देवीने अट घातली की मी येते परंतु बरोबर येताना मागे पाहू नको . देवी मागे येत असताना त्याने लक्षात न राहिल्याने मागे पाहिले आणि देवी अदृश्य झाली. ज्या ठिकाणी देवी अदृश्य झाली त्या ठिकाणाला जुनी येमाई म्हणतात.
त्या मुलाने देवीला राखुळी मागितली ,देवीने त्याला मोहरा बांधून दिल्या. त्या मोहरांचा जागेवर पेटते कोळसेच दिले असे त्या गुराख्याला वाटले . त्याने ते सोडून पहिले ते तर पेटलेले कोळसेच निघाले. त्याने ते खाली टाकून देताच त्याच्या गारा झाल्या. त्या ठिकाणाला गारमाळ म्हणतात.नाराज झालेला गुराखी घरी आला आणि सर्व प्रकार आईला सांगितला. आईने घोंगडी झटकली तर त्यात एक मोहर निघाली .आईला सर्व प्रकार लक्षात आला व तिने देवीची प्रार्थना केली. देवीने प्रसन्न होवून माझे मंदिर बांध म्हणून सांगितले.

येमाई देवी मंदिराचा जीर्णोद्धारचे काम भाविक व ग्रामस्थांचा सहकार्याने सुरू आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो त्यात. सप्तशती पाठ वाचन, ओलंडा, महाआरती, जागरण गोंधळ, देवीची गाणी, महाआरती भजने, कथ्थक नृत्ये, भजने, अभंग , भावगीते असे विविध कार्यक्रम होत असतात. विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी पालखी निघते. जुन्या येमाई मंदिराकडे जाते. पुणे , नगर मुंबई, ठाणे, यापरिसरातील अनेक परिवारांची कवठे येमाई कुलदैवता असून कुलाचार विधी करण्यासाठी राज्य व परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. देवस्थानला क वर्ग दर्जा मिळाला असून चैत्र शुद्ध पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून मंदिर जीर्णोद्धारचे काम सुरू असल्याचे विजयकुमार रामचंद्र गोरे पाटील यांनी सांगितले. 