Uncategorizedधार्मिंकराष्ट्रीय
शिवनामाच्या अखंड गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री शिवमहापुराण कथेची भावपूर्ण सांगता; शिरूर भक्तिरसात न्हाऊन निघाले
-
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24) : ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात आणि शिवनामाच्या अखंड गजरात सात दिवस सुरू असलेल्या श्री शिवमहापुराण कथेची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. घोडनदी परिसरात उसळलेल्या भक्तीच्या महासागराने संपूर्ण शिरूर नगरीला अध्यात्मिक उर्जेने भारावून टाकले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून दि. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा पार पडली. श्रद्धा, विश्वास आणि सदाचार यांचा संदेश देत त्यांनी भाविकांच्या अंत:करणात अध्यात्माची ज्योत प्रज्वलित केली.
-
“श्रद्धेने आणि विश्वासाने शिवपुराणाचे श्रवण केल्यास निश्चितच चांगले फळ मिळते. शिव आहे म्हणून सत्य आहे,” असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनावर भाष्य केले. “आज भोजनाची कमी नाही, पण भूक नाही; सुविधा मुबलक आहेत, पण झोप नाही. माणूस गोड खातो, पण गोड बोलत नाही,” या मार्मिक शब्दांतून त्यांनी समाजाला स्नेह, संयम आणि सद्वर्तनाचा संदेश दिला.


-
प्रदोषकाळात एक दिवा लावण्याचा नियम, दररोज एक तांब्या पाणी शिवलिंगावर अर्पण करण्याची प्रभावी साधना, तसेच बेलपानाचे आध्यात्मिक व आरोग्यदायी महत्त्व याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. “चुकीची कर्मे करू नका; जसे वागाल तसे फळ मिळेल,” असा कर्मयोगाचा संदेश देत त्यांनी शिवसाधनेतून जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते, असे सांगितले.
आगामी कुंभमेळा, नाशिक येथे शिवपुराण कथेचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. -
या भव्य सोहळ्यास लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. सुमारे ३० एकरांहून अधिक जागेवर उभारलेला सुसज्ज व भव्य मंडप, मुख्य मंडपासह प्रसादासाठी स्वतंत्र व्यवस्था, भोजन, स्वच्छता, पार्किंग व वाहतूक यासाठी स्वतंत्र समित्या — या सर्व नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडला. दररोज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

-
“श्री शिवमहापुराण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा उपक्रम आहे,” असे भावनिक प्रतिपादन मुख्य संयोजक उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी केले.
“हा कार्यक्रम सर्वांचा होता; शिरूरकरांच्या सहकार्यामुळेच तो यशस्वी झाला,” असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्वर्गीय रसिकलाल धारिवाल हे शिवभक्त होते, त्यांच्या प्रेरणेनेच हा सोहळा साकार झाल्याचे त्यांनी नमूद केले.
-
समारोप सोहळ्यास उद्योगपती आदित्य धारिवाल, दिनाभाभी धारिवाल, साक्षी धारिवाल,उज्ज्वला लुंकड, सुरेखा चोपडा, कल्पना लुनावत,आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘हर हर महादेव’च्या गजरात आणि भजनांच्या तालावर भाविकांनी भक्तिरसात नृत्य करत अध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली.

रसिक विचार मंचच्या वतीने श्री.शिवमहापुराण कथेचे आयोजन केल्याबद्दल रसिक विचार मंचच्या वतीने उद्योगपती प्रकाश लालजी रसिकलालजी धारिवाल व आदित्य प्रकाशलालजी धारिवाल यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
-

-
भक्ती, शिस्तबद्ध नियोजन आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम असलेला हा सोहळा शिरूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ‘भोळ्या शंकरा’च्या कृपेची अनुभूती हृदयात साठवत हजारो भक्त भावपूर्ण मनाने परतले.

oplus_131074

oplus_131074
-


-
