Uncategorizedधार्मिंकविशेष

शिरूरमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिरंग; दिंडी, अभंग आणि भक्तिसंगीताने परिसर विठ्ठलमय

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरूर शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळे, भक्तिसंगीत कार्यक्रम आणि विठ्ठल नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. लहान विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला.

कुंभार आळी येथील विठ्ठल मंदिरात ओंकार संगीत विद्यालयाच्या वतीने ‘भावगंध’ या भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. संध्याकाळी श्री. गणेश मराठे यांनी गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘खेळ मांडियेला’, ‘दर्शन दे रे’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘अजी सोनियाचा दिनू’, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘चंद्रभागेच्या तीरी’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ यांसह अनेक लोकप्रिय अभंग व भक्तिगीते सादर करण्यात आली. केतन गोसावी यांच्या ‘दिव्य सोहळा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमात श्री. गणेश मराठे, डॉ. समीर ओंकार, डॉ. नूतन क्षीरसागर, श्री. नितीन मामीडवार, श्री. केतन गोसावी, सौ. मानसी घोडके, शिल्पा घोडे, संगीता धोंगडे आणि माधुरी निगडे यांनी गायन सादर केले. यश बुरांडे यांनी तबल्याची साथ केली, तर मानसी घोडके यांनी सूत्रसंचालन केले. अखिल कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सभापती डॉ.सुनीता पोटे, नगरसेविका स्वप्नाली जामदार, बाळासाहेब जामदार, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

दरम्यान, आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण पायी दिंडी सोहळा पार पडला. श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे पूजन व आरतीनंतर टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी काढली. विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने उपस्थितांचे मन जिंकले.

या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरणे, जीवन विकास मंदिरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र धनक, नगरसेविका संगीता मल्लाव, स्वाती साठे, आयशा सय्यद, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार, माजी सरपंच वर्षा काळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, सारिका पवार, प्रिया घोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास, सामाजिक समावेशकता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक होत असल्याचे सांगितले.

याचप्रमाणे ग्राममंगल बहुउद्देशीय विकास संस्थेच्या बी.के.सी. सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत तर महिला पालकांनी पारंपरिक पोशाखात सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष दादा चौधरी व सचिव मनिषा चौधरी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाचे पूजन करण्यात आले. अभंग, भजन, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी रिंगण तर महिला पालकांनी फुगडी सादर करून वारकरी परंपरेचा आनंद लुटला.

दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका प्रियांका शेडगे, स्नेहल पाचरणे, सुहानी शिंदे, किशोरी लगड, गिरिजा मराठे, भारती थोरात, धनश्री वाघ, माधुरी सातपुते, प्रियांका दैठणकर आणि मनिषा बेलोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरूरमध्ये पार पडलेल्या या विविध उपक्रमांमुळे वारकरी परंपरा, भक्ती, संस्कार आणि सामाजिक समावेशकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन, शिरूर आणि ओन्ली वुमन्स जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फराळ वाटप उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेवा, संस्कार आणि भक्तीचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमात शेकडो भाविकांना खिचडी, केळी आणि गरम चहाचा फराळ वाटप करण्यात आला.

वुमन्स सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या नेतृत्वाखाली आणि संस्थेच्या सदस्यांच्या नियोजनातून हा सेवाभावी उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. महिलांनी अभंग, भजन आणि विठ्ठलभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले, तर पारंपरिक फुगड्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढविली.

या उपक्रमास शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरणे, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, नगरसेवक सागर नरवडे, अमोल चव्हाण, माजी सभापती संतोष शितोळे, रविंद्र धनक, मराठा महासंघाच्या शोभना पांचगे, आधारछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, भाजपाचे निलेश नवले, डॉ. सरोदे, शिवसेनेचे प्रमोद जोशी तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वुमन्स सोशल फाउंडेशनच्या सदस्या सुजाता पाटील, नीलमधू शर्मा, विजयालक्ष्मी उपाध्याय, जयश्री थिटे, मीराताई परदेशी, रोहिणी बढे, कविता परदेशी, नयना परदेशी, भारती शहाणे आणि सृष्टी करंजुले यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वागत, नियोजन, फराळ वाटप आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button