Uncategorized

ज्ञान माऊली’ने शिरूरमध्ये रंगला भक्ती-ज्ञानाचा जागर अभंग, लघुनाटिका व मनोगतातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -23}संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुणे महसूल विभागातील सर्व तालुक्यांत एकाच दिवशी ‘ज्ञान माऊली’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून  ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी येथे हा कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात संगीत विशारद श्रीहरी मेंहदलकर व भजनी मंडळाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग, भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अभंगांच्या माध्यमातून माऊलींचे जीवनकार्य, साहित्य, अध्यात्म आणि विश्वकल्याणाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

ज्ञानगंगा शाळेतील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून माऊलींच्या जीवनातील विविध प्रसंग जिवंत झाले.

यावेळी डॉ. अयोध्या जाधव-क्षीरसागर यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली – काळाची गरज’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. समता, बंधुभाव, भूतदया आणि विश्वकल्याणाचा माऊलींचा विचार आजच्या समाजासाठी अधिक आवश्यक असून, तो आचरणात आणण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मैत्र जीवांचे’ हा माऊलींचा संदेश प्रेम, मानवता आणि सामाजिक एकोपा दृढ करणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजाराम घावटे, सचिव सविता घावटे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, दुय्यम निबंधक अशोकराव जाधव, राघव फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर जाधव, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरणे, नगरसेवक अमित कर्डिले, विवेकानंद क्षीरसागर, दत्तात्रय पांडे, डॉ. अंकुश बनकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका जयश्री कणसे यांनी केले, तर आभार प्राचार्य चेतन देशमुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button