महाराष्ट्र

बाबुराव नगरच्या रस्त्यांची दुरवस्था; ग्रामपंचायतीवर मोर्चाचा इशारा

15 ते 20 हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडून दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बाबुराव नगर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, बंदिस्त गटार योजनेतील बिघाड  यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रश्न तातडीने न सोडवल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

बाबुराव नगरमध्ये सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या वास्तव्यास असून, या परिसरातून सर्वाधिक कर वसूल केला जातो. मात्र त्यानुसार मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला. परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बंदिस्त गटार योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी ती सध्या नादुरुस्त अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

“नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो, मात्र त्याच्या बदल्यात आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. रस्ते आणि गटारांची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांचा भव्य मोर्चा ग्रामपंचायतीवर काढण्यात येईल,” असा इशारा नितीन बोऱ्हाडे यांनी दिला.

दरम्यान, या संदर्भात उपसरपंच संजय शिंदे यांनी ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, बाबुराव नगरातील बंदिस्त गटार योजनेचा पाइप अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे दाबला गेल्याने गटार लाईन चोकअप झाली आहे. त्यामुळे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊ लागले.

या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र काम सुरू असून, ब्रेकरच्या सहाय्याने रस्ता फोडून सुमारे 150 फूट नवीन गटार लाईन मोकळी करण्यात आली आहे. उद्यापासून नवीन पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून पुढील दोन दिवसांत गटार योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा शिंदे यांनी केला.

या कामांमुळे स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची जाणीव ग्रामपंचायतीला असून, समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button