राष्ट्रीयविशेष

वेळेत सुरू केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी स्वप्ने पूर्ण करू शकते.

सनशाइन सॅटर्डे क्लबच्या व्याख्यानात कंपनी सेक्रेटरी पवन चरेजा यांचे मत

oplus_131074

शिरूर  डेली न्यूज पोस्ट टीम 24}: वेळेत सुरू केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी स्वप्ने पूर्ण करू शकते. मात्र गुंतवणूक करताना स्वतःची आर्थिक क्षमता, उद्दिष्टे आणि जोखमीची तयारी लक्षात घेऊन एकाच पर्यायात पैसे न गुंतवता विविध पर्यायांचा समतोल साधणे आवश्यक आहे, असा सल्ला कंपनी सेक्रेटरी पवन चरेजा यांनी दिला.

येथील सनशाईन सॅटर्डे क्लबच्या वतीने ‘ आर्थिक नियोजन व गुंतवणुकीचे पर्याय’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, माजी मुख्य अभियंता ज्ञानेश्वर जामदार, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,नगरसेविका पूजा पोटावळे, प्रा. चैतन्य वाघ, माजी ग्रंथपाल राजाभाऊ वाघ, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी झालेल्या अपूर्वा ज्ञानदेव चव्हाण यांचा सन्मान निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

चरेजा यांनी सांगितले की, कोणतीही गुंतवणूक करताना महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळणे अत्यावश्यक आहे. केवळ बचत करून भागत नाही, तर त्या बचतीवर योग्य परतावा मिळेल याची दक्षता घ्यावी लागते. गुंतवणूक ही अल्पकालीन नव्हे तर दीर्घकालीन दृष्टीकोनातून करावी लागते. त्यासाठी संयम, सातत्य आणि नियोजन या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

मुदत ठेवी, शेअर्स, सोने, कर्जरोखे, मालमत्ता, म्युच्युअल फंड आदी गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असून प्रत्येक पर्यायाची जोखीम व परतावा वेगळा असतो. त्यामुळे सर्व रक्कम एका घटकात गुंतविण्यापेक्षा वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक करून जोखीम संतुलित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक नियोजन, वैयक्तिक व कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन, शाश्वत संपत्ती निर्मितीची साधने आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आर्थिक दिशा यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगताना, आरोग्य चांगले ठेवणे शक्य नसल्यास योग्य विमा संरक्षणाची तरतूद करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. विमा हा खर्च नसून भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची हमी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले तर आभार प्रा. चैतन्य वाघ यांनी मानले. कार्यक्रमास क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button