शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: प्रवासी व भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत शिरूर बस स्थानकातून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरासाठी थेट बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या मंगळवार, २१ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांनी दिली.
शिरूर परिसरातून अक्कलकोटकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून, दररोज नियमित बससेवेची मागणी वाढत होती. याची दखल घेत ही नवीन सेवा सुरू करण्यात येत आहे.
दररोज दुपारी २ वाजता बस शिरूर बस स्थानकातून सुटणार असून, न्हावरा, केडगाव, चौफुला व इंदापूर मार्गे सायंकाळी सुमारे ८ वाजता अक्कलकोट येथे पोहोचेल. बस मुक्कामी थांबणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता परतीचा प्रवास सुरू करून दुपारी १ वाजता शिरूर येथे आगमन होईल.
उन्हाळी भाडेवाढ लक्षात घेऊन या सेवेसाठी तिकीट दर ५५० रुपये निश्चित करण्यात आला असून, महिलांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध राहणार आहे.
याशिवाय, ४० प्रवाशांचे समूह बुकिंग केल्यास साडेतीन शक्तीपीठे तसेच पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थक्षेत्रांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच उज्जैन, इंदूर व ओंकारेश्वर यात्रेसाठीही विशेष बससेवेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उज्जैन यात्रेसाठी पुरुष प्रवाशांसाठी ये-जा भाडे २४०० रुपये असून, महिलांना सवलत दिली जाणार आहे.
या नव्या बससेवेचा प्रवासी व भाविकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांनी केले आहे.
शिरूर परिसरातील स्वामी भक्तांसाठी अक्कलकोट येथे बससेवा सुरु करावी अशी मागणी सातत्याने श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर कडून होत होती.
सदर बस मध्ये महिलांसाठी व ज्येष्ठांसाठी 50 टक्के सवलत तसेच 75 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठांना मोफत सवलत लागू असणार आहे.





