राष्ट्रीय

रामलिंग यात्रेनंतर विद्यार्थ्यांचा ‘स्वच्छता संकल्प’; श्रमसंस्कारांचा जीवन विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा आदर्श

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }: भक्तिभावाने पार पडलेल्या रामलिंग यात्रेनंतर मंदिर परिसरातील कचऱ्याची स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले ते लहानगे शालेय विद्यार्थी. रामलिंग मंदिर परिसरात दोन दिवसांच्या यात्रेनंतर निर्माण झालेल्या कचऱ्याची साफसफाई करत जीवन विकास मंदिर विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश कृतीतून दिला.

शिक्षक लक्ष्मण शिंदे, अमोल जाधव आणि रेणुका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातमोजे, कचऱ्याच्या पिशव्या आणि झाडू घेऊन मंदिर परिसरात श्रमदान केले. प्लास्टिक, कागद व इतर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी रस्ते झाडून स्वच्छ केले, तर काहींनी कचरा वेगळा करण्याची जबाबदारी सांभाळली.

यात्रेनंतर निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झाला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे परिसर पुन्हा स्वच्छ व सुशोभित झाला. ‘श्रमेव जयते’चा संस्कार अंगीकारत विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवून दिली.

या उपक्रमा संदर्भात माहिती देताना माहिती देताना कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मनात श्रमसंस्कार, पर्यावरणप्रेम आणि सार्वजनिक ठिकाणांबाबतची जबाबदारी रुजविणे. स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक म्हणून कर्तव्य याची माहिती व्हावी या उद्देशाने मागील काही वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो.

स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या कृतीचे मनापासून कौतुक केले. “लहान वयातच सामाजिक भान जागृत होणे ही सकारात्मक बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात चांगला संदेश जातो,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

जीवन विकास मंदिर विद्यालयाचा हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता मूल्यसंस्कारांची शिकवण देणारा ठरला आहे. यात्रेच्या उत्साहानंतर स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श घालून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button