राष्ट्रीयविशेष

शिरूरला १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे

भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांची मागणी

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरूर शहर आणि परिसराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी जिल्हाधिकारी पुणे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देताना भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सृष्टी करंजूले, निलमधू शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शिरूर शहरासह तालुक्याची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. शेजारील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकदेखील उपचारासाठी शिरूरमध्ये येतात. रांजणगाव एमआयडीसी , करडे घाटातील इलेक्ट्रॉनिक हब आणि पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहनांची सततची वर्दळ यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची संख्या ही मोठी आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा अपुऱ्या असल्याने गंभीर रुग्णांना पुणे किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते. अशा परिस्थितीत शिरूरमध्ये १०० खाटांचे आधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे बिरादार यांनी सांगितल.
शहरातील विद्यमान ग्रामीण रुग्णालयात गंभीर आजाराचे, अपघातग्रस्त रुग्ण दररोज दाखल होत असतात, मात्र बेड व यंत्रसामग्रीच्या कमतरतेमुळे त्यांना त्वरित उपचार मिळत नाहीत. यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो. औद्योगिक परिसरातील कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर मंजूर व्हावे अशी मागणी बिरादार यांनी केली.
दरम्यान या मागणीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी शिरूर नगरपरिषद व शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी सुमारे पाच एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्तावावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असल्याचे ही बिरादार म्हणाल्या.
शिरूर शहर व तालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण व महामार्गावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोठया शासकीय रुग्णालयाची गरज आहे.
१०० खाटांचे आधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास शिरूर तालुका, पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळतील व अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button