शिरूर : कवठे येमाई , ता. शिरूर गावातील अष्टविनायक महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर–ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कपिल किशोर वारे (वय २४) रा. लाखण गाव, ता. आंबेगाव जि. पुणे असे अपघातात मरण पावलेल्याचे नाव आहे.या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७/२०२६ अन्वये बीएनएस कलम १८६(१), १२५(ए), १२५(बी), २८५, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १२२ व १७७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऋषिकेश दिपक वारे (वय २७, व्यवसाय शेती, रा. लाखणगाव, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
हा अपघात २ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास अष्टविनायक महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळ झाला. पंपा जवळ महिंद्रा अर्जुन आल्ट्रा ५५५ मॉडेलचा, क्रमांक नसलेला ट्रॅक्टर ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉलींसह रस्त्यावर उभा होता. ट्रॉलीपैकी एका ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने चालक गौतम दत्तात्रय थिटे (रा. औरंगापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली न घेता तसाच महामार्गावर उभा ठेवला होता .
याच दरम्यान, लाखणगाव येथील कपिल किशोर वारे (वय २४) हे त्यांच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच १४ केवाय ४६८७) दुचाकीवरून येत असताना ट्रॅक्टरच्या मागील ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहे.