विशेष

मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी एकमेकांना आधार द्या, सकारात्मक विचार ठेवा: डॉ. वृषाली राऊत

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी एकमेकांना आधार द्या, सकारात्मक विचार ठेवा आणि नियमित दिनचर्या अंगीकारा. मानसिक धक्का कोणालाही बसू शकतो; मात्र त्यातून नक्कीच बाहेर पडता येते, असा विश्वास मनोविकारतज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी व्यक्त केला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने आयोजित धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेत ‘मानसिक धक्क्यातून सावरताना’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर श्रेणिक नहार, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट, समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, संदीप बबर्वे आदी उपस्थित होते.

कोविडनंतर माणसांच्या आयुष्यात मोठे बदल झाले असून कोविड हा सर्वांसाठीच एक मानसिक धक्का होता, असे सांगताना डॉ. राऊत म्हणाल्या, ‘‘कोविडनंतर लोकांमध्ये राग वाढला, संयम कमी झाला. दिनचर्या बिघडली, झोप कमी झाली. मोबाईलचा वापर वाढला, वाचन कमी झाले आणि स्मरणशक्तीवरही परिणाम झाला. मानसिक धक्का म्हणजे अशी घटना जी माणसाला भीतीच्या छायेत जगायला भाग पाडते. त्यातून निराशा, नकारात्मक विचार आणि ताण वाढतो.’’

भूतकाळात अडकून न राहता वर्तमानात जगण्याचा सल्ला देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नव्हे. मानसिक धक्का बसलेल्या व्यक्तींना नाती टिकवणे अवघड जाते. अशा वेळी कुटुंबीयांनी व मित्रांनी आधार देणे गरजेचे आहे.

‘‘सततचा राग, भीती आणि चिडचिड ही धोक्याची घंटा आहे. त्यातून व्यसनांकडे वळण्याची शक्यता वाढते. मोबाईल व सोशल मीडियापासून मधूनमधून ब्रेक घ्या. जेवण व झोपेच्या वेळा नियमित ठेवा. मोबाईलचा वापर तुम्ही करा; मोबाईलने तुमचा वापर करू नये,’’ असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक मंगेश खांडरे यांनी केले. डॉ. वैशाली साखरे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन विलास गोसावी यांनी केले.आभार माजी सभापती प्रदीप बारवकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button