राष्ट्रीयविशेषशैक्षणिक

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर शिक्षणाची उंच भरारी घेत शिरूर येथील मंगल लक्ष्मण बैनाडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर शिक्षणाची उंच भरारी घेत शिरूर येथील मंगल लक्ष्मण बैनाडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. भाजी विक्रेत्याची मुलगी असलेल्या मंगल यांच्या या यशाने परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून ‘बँकिंग अँड फायनान्स’ या विषयात त्यांनी संशोधन पूर्ण केले. ‘पुणे जिल्ह्यातील लघु उद्योगांच्या विकासामध्ये बँकांची भूमिका’ या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अधिछत्रवृत्तीही प्राप्त झाली.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे डॉ. मोहन चौधरी आणि डॉ. अर्चना माळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला.
घरची आर्थिक परिस्थिती मर्यादित असताना वडील लक्ष्मण बैनाडे भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई गेंदाबाई बैनाडे यांच्या कष्टमय पाठबळासह भाऊ चंदुलाल व रविंद्र बैनाडे यांच्या विश्वासामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना मंगल यांनी व्यक्त केली. तसेच संगीता गुगळे, प्रिया लोढा, डॉ. व्यंकटेश पाटील, नंदकुमार निकम आणि रवींद्र कोठावदे, यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व कुटुंबीयांना अर्पण करताना मंगल बैनाडे यांनी शिक्षणाच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते, हे पुन्हा अधोरेखित केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिरूर परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button