क्राईमराष्ट्रीय

लग्नासाठी दबाव; तीन वर्षीय चिमुकल्याची हत्या, प्रियकर अटकेत

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून तीन वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातील एका तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी पप्पु कोल (वय 25) या कारेगाव येथील कल्याणी कंपनीमागील परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. त्यांचा तीन वर्षीय मुलगा अंशु पप्पु कोल याचा बुधवारी (दि. 17) दुपारी साडेबारा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

या प्रकरणात देवांशु आदित्य साहू (रा. बरटोला, ता. व जि. अनुपपूर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने फिर्यादीवर लग्नासाठी दबाव टाकला होता. फिर्यादीने आपल्या मुलाला वडिलांकडे सोडून न देता आरोपीशी लग्न करण्यास नकार दिल्याने तो संतप्त झाला. त्यानंतर त्याने तीन वर्षीय अंशु याच्या तोंड, ओठ, डोळे व नाकावर मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी देवांशु साहू याला गुरुवारी (दि. 18) पहाटे अटक करण्यात आली.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 103(1) अन्वये गुन्हा क्रमांक 278/2026 दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश थोरात यांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे पुढील तपास करीत आहेत.

चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ

अवघ्या तीन वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर कारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाच्या वादातून निरागस बालकाचा बळी गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button