शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५, मूळ रा. करोडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) ही आपल्या कुटुंबीयांसह मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात झोपली होती. बुधवारी (दि. २२) पहाटे सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने गोठ्यात घुसून भाग्यश्रीला उचलून नेल्याचे तिचे काका बाबासाहेब कोंडीबा वारे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. मात्र बिबट्याने चिमुकलीला जवळील ऊसाच्या शेतात नेले. त्यानंतर गावातील नागरिक, वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबवली. काही वेळाने भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्र. ११९/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत खडे, स्मिता राजहंस व तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी भेट दिली. गव्हाणे यांनी सांगितले की यापूर्वी या परिसरात पिंजरे लावण्यात आलेले होते. पुन्हा नव्याने ६ पिंजरे लावण्यात येणार आहे. परिसराची ड्रोन ने पाहणी करण्यात येणार असून गस्त ही वाढविण्यात आली आहे . बिबटयास जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
पिंपळसूटी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांची संख्या वाढत आहे. रात्री दिवसा कधीही बिबट्याचे शेतामध्ये दर्शन होत आहे. पशुधनांवर नियमित हल्ले होत आहे. मागील वर्षीही एका चिमुकलीच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी अंत झाला होता.