विनम्रतेतून कर्तृत्वाचा इतिहास घडविणारे किशोर राजे निंबाळकर
विनम्रता त्यांच्या ठायी, संस्कारांचा वारसा;
मनी असे जनकल्याणाचा वसा, अन् कर्तृत्वातून उमटविला परिवर्तनाचा ठसा !
आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात की, त्यांच्या सहवासातून, विचारातून, साधेपणातून आणि कर्तृत्वातून जीवनाला नवी दिशा मिळते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.
अशा ऊर्जावान, सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले आदरणीय किशोर राजे निंबाळकर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याचा हा दिवस.
न्हावरा या ग्रामीण भागात जन्मलेल्या किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशाची विविध शिखरे सर केली. शिक्षक वडील दत्तात्रेय राजे निंबाळकर यांनी शिक्षणाची गोडी आणि संस्कारांची शिदोरी दिली.
एम.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारला आणि प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी प्रशासनात आपल्या कार्याची स्वतंत्र छाप निर्माण केली.



प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना पदाचा डामडौल न मिरवता सामान्य माणसाशी सहजपणे संवाद साधणे, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्याच्या प्रश्नाला योग्य मार्ग दाखवणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. शालीनता, विनम्रता, अभ्यासूपणा, वक्तशीरपणा, दिलदारपणा, संयम, नेतृत्वगुण आणि इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती या गुणांचा सुंदर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
अनेक मंत्रीमहोदयांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम, महसूल, पाणीपुरवठा यांसारख्या विविध विभागांत त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. पंढरपूर, अक्कलकोट आदी ठिकाणी काम करताना विकासकामांना गती देण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. विविध रस्ते, पाणीपुरवठा योजना आणि प्रशासकीय पातळीवरील अनेक कामांना त्यांनी चालना दिली. ‘सारथी’ची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना युवकांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि अभ्यासू वृत्तीचा त्या काळात उपयोग झाला. मात्र, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडूनही अत्यंत विनम्रता व साधे lपणा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे.
त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणे, प्रश्नाची पार्श्वभूमी समजून घेणे आणि त्यावर कोणत्या मार्गाने तोडगा निघू शकतो, याबाबत मार्गदर्शन करणे, हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. आजच्या धावपळीच्या काळात दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे हीच मोठी गोष्ट आहे. निंबाळकर साहेब मात्र त्यासाठी वेळ देतात. त्यामुळेच त्यांच्या न्हावरा येथील निवासस्थानी आपला प्रश्न घेऊन येणाऱ्या सामान्य माणसाला आपलेपणाची जाणीव होते.
शेती, माती आणि गावाकडच्या माणसांशी त्यांचे असलेले नाते आजही तितकेच घट्ट आहे. प्रशासकीय सेवेत असतानाही आणि निवृत्तीनंतरही त्यांनी ग्रामीण भागाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. गावी आल्यानंतर पद, प्रतिष्ठा आणि अधिकार बाजूला ठेवून ते सर्वसामान्यांमध्ये मिसळतात. त्यामुळे अनेकांसाठी ते अधिकारी नसून भाऊ, दादा, काका, मामा अशा आपुलकीच्या नात्यांनी जोडले गेले आहेत.
शिरूर परिसरातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण व्हावी, विविध विषयांवर संवाद घडावा आणि समाज अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने त्यांनी सनशाईन सॅटर्डे क्लबची स्थापना केली. या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्याख्याने आणि संवादाचे कार्यक्रम शिरूरमध्ये झाले. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत व्यापक ज्ञान पोहोचविण्याचा हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरतो.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न पाहिले आणि रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. त्याच रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी किशोर राजे निंबाळकर यांची नुकतीच नियुक्ती झाली, हा शिरूरसाठी अभिमानाचा क्षण आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-तंत्रज्ञान, पर्यावरणीय बदल आणि हवामान बदल यामुळे जग वेगाने बदलत आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षणपद्धतीतही काळानुरूप परिवर्तन होणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि बदलत्या जगाशी जुळवून घेणारे शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.
निंबाळकर साहेबांचा व्यापक प्रशासकीय अनुभव, शिक्षणाविषयीची आस्था आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची भूमिका यामुळे रयत शिक्षण संस्थेला आगामी काळात नवी दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो.
एका ग्रामीण कुटुंबातून आलेला विद्यार्थी प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोहोचतो, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतो, निवृत्तीनंतरही समाजाशी असलेले नाते जपतो आणि पुढे आशिया खंडातील अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतो—ही केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नाही; तर संस्कार, शिक्षण, कर्तृत्व आणि समाजसेवेच्या संगमातून घडलेल्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे.
किशोर राजे निंबाळकर साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजहितासाठी कार्य करण्याची अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा.
शब्दांतून शुभेच्छांचा हा मानाचा मुजरा…
विनम्रतेचा दीप तेवत राहो,
कर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहो,
ज्ञानाची गंगा जनमनात वाहो,
सेवेचा वसा अखंड जागत राहो.
नव्या वाटांना नवी दिशा मिळो,
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे आकाश मिळो,
शिरूरच्या मातीचा मान उंचावत राहो,
किशोर राजेंच्या कार्याचा इतिहास घडत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!