विशेष
इनामगाव येथे बिबटया जेरबंद. पकडलेल्या बिबटया नर व ७ वर्षाच्या
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) —इनामगाव(ता. शिरूर) येथे गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. नलगे मळा परिसरातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीवरून वन विभागाने पिंजरा लावला होता. 
दरम्यान जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव (वय ८५ वर्ष ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही वर्षांत शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये १० हून अधिक नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

नलगे मळा परिसरातील नागरिकांनी वन विभाग यांचेकडे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत वन विभागाने कारवाई केली. अखेर आज (शुक्रवार) सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
दरम्यान, जांबूत परिसरात एकूण १२ तर टाकळी हाजी येथे २ असे मिळून १४ पिंजरे लावण्यात आल्याचे तालुका वन अधिकारी निलकंठ गव्हाणे यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांत पिंपरखेड परिसरात ३ आणि टाकळी हाजी येथे १ असा एकूण चार बिबटे जेरबंद करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.
ग्रामीण भागात वाढत असलेली बिबट्यांची उपस्थिती ही चिंता वाढवणारी बाब असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
