राष्ट्रीय

जनगणना २०२७ : राज्यात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने नोंदणी; १ ते १५ मेदरम्यान स्वयंगणनेची सुविधा

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेत यंदा प्रथमच डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरबसल्या स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा जनगणना सन २०२७ चे २०२७ चे चार्ज अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
जनगणना ही देशाच्या धोरणात्मक व संख्यात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. यामधून मिळणाऱ्या आकडेवारीचा उपयोग विविध शासकीय योजना, विकास आराखडे आणि अंमलबजावणीसाठी केला जातो.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान पार पडणार असून, यामध्ये घरयादी व घरगणना केली जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना ‘Self-Enumeration’ म्हणजेच स्वयंगणनेची संधी देण्यात आली आहे. यासाठी https://se.census.gov.in⁠ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून स्वतःची माहिती भरता येणार आहे.
स्वयंगणना पूर्ण केल्यानंतर प्रत्येक नागरिकास स्वतंत्र ओळख क्रमांक (आयडी) दिला जाणार आहे. हा आयडी जतन करून ठेवणे आवश्यक असून, १६ मेनंतर जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकास तो सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर संबंधित प्रगणक पोर्टलवर आयडी अपलोड करून माहितीची अधिकृत नोंद करतील.
या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांची माहिती गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, या पोर्टलवर १४ भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन स्वयंगणना पूर्ण करावी व जनगणना या राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार तथा जनगणना-२०२७ चे चार्ज अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button