Uncategorized

शिरूर : रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी सामूहिक बैठकीचे आवाहन

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने समन्वयित उपाययोजना करण्याची मागणी होत असताना सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कृपावती रामचंद्र धनक यांनी नागरिक, स्थानिक संस्था आणि सरकारी यंत्रणांना एका सामूहिक बैठकीचे आवाहन केले आहे.
शहरातील वाढती वाहने, अपुरी पार्किंग सुविधा, बायपासवरील बेफाम वेग, रात्री प्रकाशयोजनेचा अभाव तसेच चुकीच्या ठिकाणी निर्माण झालेली स्पीड ब्रेकर यामुळे प्रवास अधिकाधिक धोकादायक बनत असल्याचे धनक यांनी निवेदनात म्हटले आहे. शिरूर बायपासवरील तीन अंडरपासपैकी काही ठिकाणी योग्य उतार–चढाव नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय सरदवाडी परिसरातील अशास्त्रीय स्पीड ब्रेकर आणि पुणे–अहिल्यानगर महामार्गाच्या नव्या कामामुळे येणाऱ्या संभाव्य वाहतुकीच्या कोंडीचीही त्यांनी नोंद घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, रस्ते बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, पोलीस, नगरपालिका, ॲम्बुलन्स सेवा तसेच सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन व्यापक धोरण आखण्याची गरज आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरूरमधील वाढत्या अपघातांविरोधात ठोस उपाययोजना, आवश्यक सुधारणा आणि संबंधित खात्यांकडून कोणती कामे अपेक्षित आहेत यावर चर्चा करण्यासाठी लवकरच विचारमंथन व नियोजन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती धनक यांनी दिली.
“ही केवळ बैठक नसून शिरूरकरांच्या जीवित सुरक्षेसाठीचे जनआंदोलन असेल,” असे धनक म्हणाले. इच्छुक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

संपर्क : ९२२५५ ४७७३९ – रवींद्र कृपावती रामचंद्र धनक

पत्रकार प्रा.डॉ. दत्तात्रय कारंडे यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button