Uncategorizedमहाराष्ट्र
भाषा ही संस्कृतीचा आत्मा : श्रीपाल सबनीस

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}भाषा हा संस्कृतीचा आत्मा आहे. भाषेमुळेच नवी संकल्पना जन्माला येते. विचारांची, संस्कृतीची ओळख होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ,ती विविध ज्ञानशाखांमध्ये सहजपणे वापरता आली पाहिजे, म्हणजेच ती भाकरी देणारी भाषा झाली पाहिजे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक, लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते “मराठी भाषा – सद्यस्थिती व भवितव्य”या विषयावर बोलत होते याप्रसंगी ते म्हणाले की, आज जवळपास 300 बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रमाणभाषा जिवंत ठेवण्याचे काम बोली करते त्यामुळे मराठी व मराठीच्या बोली जगल्या पाहिजे. सातवीपर्यंत मराठीच शिकवली पाहिजे. मराठी भाषा ही पहिल्या क्रमांकाने सक्तीची असावी. स्वाभाविक असावी. त्यानंतर इतर भाषांचा विचार करा .प्रथम पासून त्रिभाषेचा सिद्धांत हा लहान मुलांवर अन्याय करणारा ठरेल. मराठी शाळा बंद पडता आहेत याला पूर्णपणे समाज जबाबदार आहे.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के.सी मोहिते ते म्हणाले की, मराठीचा भूतकाळ हा उज्ज्वल व वैभवशाली असा आहे. प्रत्येक प्रदेशाची बोली ही वेगळी आहे ही विविधता जपणे गरजेचे आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एच.एस. जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ .राजाभाऊ भैलुमे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ .क्रांती पैठणकर यांनी केले तर आभार बाळासाहेब देविकर यांनी मानले .


