महाराष्ट्र
संतुलित आहार व शिस्तबद्ध जीवनशैली महत्वाची – डॉ. राजेश दाते
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या आवश्यक असून आहाराबाबत सजग राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश दाते यांनी केले.
येथील सन शाईन क्लबच्या वतीने ‘आरोग्य म्हणजे काय’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, उद्योजक भानुदास शेळके आदी उपस्थित होते.

डॉ. दाते म्हणाले की, साधेपणा, शिस्त आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारलेली जीवनशैलीच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी ठरते. रुग्णाला केवळ औषधोपचार देणे पुरेसे नसून त्याला निरोगी जीवनाची योग्य दिशा देणे अधिक महत्त्वाचे आहे. चुकीच्या आहारपद्धती, वाढता ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या यामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“आरोग्य हे महागड्या औषधांमध्ये नसून योग्य आहार, सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्येत आहे,” असे सांगत त्यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही उपस्थितांना सावध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर स्वागत व आभार प्रदर्शन भानुदास शेळके यांनी केले.







