Uncategorized

राष्ट्रीय महामार्ग एनएच-७५३एफच्या सुरक्षेसाठी वाळुंज यांचे बेमुदत आंदोलन; रोड सेफ्टी ऑडिटची मागणी

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-७५३एफचे पुणे ते अहिल्यानगरपर्यंत तातडीने रोड सेफ्टी ऑडिट करून धोकादायक ठिकाणे निश्चित करावीत, तसेच महामार्गावरील अनधिकृत दुभाजक फोडून तयार करण्यात आलेले प्रवेशमार्ग तातडीने बंद करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा बुधवारी (१९ ऑगस्ट) दुसरा दिवस होता.
महामार्गावरील अनधिकृत प्रवेशमार्ग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाळुंज यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात हॉटेल संग्रामसमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. यापूर्वीही याच ठिकाणी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी याच मार्गावर सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर विघ्नहर्ता हॉस्पिटलसमोर झालेल्या अपघातात पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
या दोन्ही घटनांना महामार्गावरील बेकायदेशीरपणे फोडलेले दुभाजक, अनधिकृत क्रॉसिंग आणि संबंधित विभागांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा वाळुंज यांनी केला. पोलिस प्रशासनाच्या मदतीने काही ठिकाणी बॅरिकेड लावून अनधिकृत मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. त्यानंतर काही प्राथमिक कार्यवाही सुरू झाली असली तरी सुरक्षा उपाययोजनांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

एनएच-७५३एफचे पुणे ते अहिल्यानगरपर्यंत संपूर्ण रोड सेफ्टी ऑडिट करून धोकादायक ठिकाणे निश्चित करावीत, अनधिकृत व धोकादायक दुभाजक क्रॉसिंग तातडीने बंद करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रमुख चौकांमध्ये आवश्यकतेनुसार सर्कल, सिग्नल, सर्व्हिस रोड, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईट,

स्ट्रीट लाईट आणि शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक उभारावेत,
रस्ते सुरक्षेकडे दुर्लक्ष करून जीवितहानीस कारणीभूत ठरलेल्या जबाबदार अधिकारी व व्यक्तींची चौकशी करून दोषानुसार सदोष मनुष्यवधासह योग्य फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच दुभाजक फोडून अनधिकृत प्रवेशमार्ग निर्माण करणाऱ्या किंवा करून घेणाऱ्या व्यावसायिक व संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी. ज्या ठिकाणी अशा अनधिकृत मार्गांमुळे मृत्यू झाले आहेत, तेथे शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अश्या मागण्या वाळुंज यांनी केल्या आहेत.
पीडब्ल्यूडी आणि एमएसआयडीसीने जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी स्पष्ट करावी, तसेच महामार्गावर संबंधित यंत्रणांचे संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन संपर्क असलेले फलक लावावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी आंदोलनकर्ते निलेश वाळुंज यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवाजीराव खेडकर आणि शरद गद्रे उपस्थित होते. वाळुंज यांच्या आंदोलनाला विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button