राष्ट्रीयविशेष

सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांच्या समितीची घोषणा, पुणे–अहिल्यानगर मार्गावरील अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

oplus_131074
oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यांत अपघातांची संख्या  वाढत असून नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  पुणे–अहिल्यानगर मार्गावरील प्रवास  धोकादायक बनत आहे. सुरक्षित प्रवास हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रतिनिधींनी घेतला आहे.या पार्श्वभूमीवर शिरूर येथील शिवसेवा मंदिरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सुरक्षित प्रवासासाठी ‘नागरिक समिती’ स्थापन करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. लवकरच समितीकडून शासनदरबारी औपचारिक निवेदन देऊन रस्ते सुरक्षेसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

बैठकीस लोकजागृती संघटनेचे ओमप्रकाश सतीजा, माजी नगरसेवक रविंद्र धनक, माजी सभापती ॲड. प्रदीप बारवकर, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मुख्याध्यापक गंगाधर तोडमल, विक्रम पाटील, रामभाऊ इंगळे, शहाबान शहा, जयेश संघवी, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण, मयूर सुपते, खुशाल गाडे, डॉ. वैशाली साखरे, डॉ. दीपक गायकवाड, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, संजय बांडे, मोहम्मद हुसेन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.बैठकीत रविंद्र धनक म्हणाले, की “पुणे–अहिल्यानगर रस्त्यावर वेगमर्यादा दर्शविणारे फलक, सिग्नल, हायमास्ट दिवे, सोलर लाईट्स त्वरित बसवावेत. अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, वाढती वाहने, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि बायपासवरील बेफाम वेग यावर त्यांनी भाष्य केले.

त्यांनी पुढे सांगितले की, शिरूर बायपासवरील तीन अंडरपासपैकी काही ठिकाणी योग्य उतार–चढाव नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पुणे–अहिल्यानगर महामार्गाच्या नव्या कामामुळे भविष्यात वाहतुकीची कोंडी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने रस्ते विभाग, पोलीस, प्राधिकरण व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने  धोरण आखणे गरजेचे आहे.

सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांनी हायवेला सर्व्हिस रोडची अत्यंत गरज असल्याचे अधोरेखित केले. मोठ्या वाहनांची रस्त्यावर अनधिकृत पार्किंग होत असल्याने गंभीर धोका निर्माण होत असून त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. “सध्याचा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे,” असेही त्या म्हणाल्या.

ॲड. ओमप्रकाश सतीजा म्हणाले की, “अपघात कोणाचाही होऊ शकतो. प्रत्येक घरातील किमान एक सदस्य दररोज या रस्त्याने प्रवास करतो. त्यामुळे सुरक्षित प्रवास हा गरजेचा नव्हे, तर अधिकार आहे. शिरूरकरांच्या जीवित सुरक्षेसाठी हे जनआंदोलन उभारले जात आहे.”बैठकीत जयेश संघवी, डॉ. वैशाली साखरे, प्रदीप बारवकर, दीपक गायकवाड, संदीप कडेकर, परवीन शेख, खुशाल गाडे, रामभाऊ इंगळे,  आदींनी रस्ते सुरक्षेसाठी विविध व्यावहारिक सूचना मांडल्या.

शिरूरकरांच्या जीवित सुरक्षेसाठी रस्ते अपघात प्रतिबंधक व्यापक कृति आराखडा तत्काळ तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिक समिती शासनदरबारी लढा देईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button