राष्ट्रीयविशेष

शिरूर : दोन बिबटे जे्रबंद, जेरबंद करण्यात आलेले बिबटे माणिकडोह निवारा केंद्र येथे रवाना

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24)शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे.

दरम्यान, काल आलेगाव पागा येथील समीर निवृत्ती वाघचौरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट जेरबंद झाला. हा बिबट मादी असून अंदाजे चार वर्षांचा आहे. त्यालाही तातडीने माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

तसेच फाकटे येथील संदीप नारायण वाळुंज यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट जेरबंद झाला आहे. हा बिबट नर असून अंदाजे सात वर्षांचा असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.

बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वन विभागाची पिंजरे लावण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button