महाराष्ट्र

शिरूरमध्ये संभाव्य भारनियमनावर भूमीपुत्र प्रतिष्ठान आक्रमक; महावितरणला उपाययोजनांची मागणी

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहर व ग्रामीण परिसरात दरवर्षी मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संभाव्य भारनियमनाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली  आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता, महावितरण शिरूर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मार्च महिना सुरू झाला की पुढील काही महिन्यांत शहर व परिसरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली अनेकदा ८–८ तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वीज खंडित होण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समाधानकारक माहिती मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर भूमीपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने पुढील महिनाभर शहर व परिसरातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. वीज खंडित होण्याच्या वेळांची तसेच त्यामागील कारणांची नोंद ठेवली जाणार असून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मिळालेली माहितीही नोंदवली जाणार आहे.

तसेच एका महिन्यात वीजपुरवठा खंडित झालेल्या घटनांची संख्या व कारणे याबाबतचा सविस्तर अहवाल महावितरणला पत्राद्वारे सादर करण्यात येणार आहे. त्यावर समाधानकारक कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्ती नसताना वारंवार भारनियमन का केले जाते, याबाबत लेखी माहिती देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button