राष्ट्रीयविशेष

कुतूहलातूनच विज्ञानाची ओढ निर्माण होते’ ; पद्मश्री अरविंद गुप्ता यांचे प्रतिपादन

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24,}विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे, विविध विषयांविषयी कुतूहल बाळगणे आणि प्रयोगातून शिकणे आवश्यक असून त्यातूनच विज्ञानाची खरी ओढ निर्माण होते, असे मत प्रसिद्ध खेळणी संशोधक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरविंद गुप्ता यांनी व्यक्त केले.

रांजणगाव एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे एमआयडीसी एज्यूस्पार्कच्या वतीने आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते. ‘विज्ञानाचा आनंद लुटा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंमधून खेळणी तयार करणे, विज्ञानातील संकल्पना प्रयोगांच्या माध्यमातून समजून घेणे आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

अरविंद गुप्ता यांनी कार्यशाळेत विविध खेळणी तयार करून त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे उलगडून दाखविली. विज्ञान हा केवळ पाठांतराचा विषय नसून अनुभवातून समजून घेण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञानविषयक प्रयोग आणि खेळण्यांवर आधारित एक हजारांहून अधिक व्हिडिओ त्यांनी तयार केले असून ते मराठीतही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अंध विद्यार्थ्यांसाठी विविध आकार आणि संकल्पना समजावून सांगणारी खेळणी विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले. वर्तमानपत्राच्या कागदापासून कागदी टोप्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी उत्साहात अनुभवले.

प्रा. डॉ. नितीन घावटे यांनी कार्यशाळेच्या उद्देशाविषयी माहिती देताना विज्ञान विषयावरील भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

यावेळी जनता दल धर्मनिरपेक्ष युवा प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, स्नेहलत्ता यादव, उमेश कणकवलीकर, गौरव कुटाळ आदी उपस्थित होते. कमलेश यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button