राष्ट्रीयविशेष

जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी शिरूर दुमदुमले; राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रेचे जंगी स्वागत

oplus_131074

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी सोमवारी शिरूर शहर दुमदुमून गेले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवजन्मभूमी सिंदखेड राजा ते रायगड (पाचाड) अशी निघालेल्या ‘राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रे’चे शिरूर शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

शहरातील हायवे सेंटर येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात शिरूरमधील जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते यात्रेचे औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे आणि नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, प्रा. डॉ. राजेराम घावटे, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती स्वाती साठे, सभापती आयेशा सय्यद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेवक उमेश शेळके, संध्या गणेश देशमुख, प्रा. चंद्रकांत धापटे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, सुनील करळे, माजी सरपंच प्रकाश थोरात, जिजाबाई दुर्गे, राणी कर्डीले, अनघा पाठक, डॉ. वैशाली साखरे, सरपंच सीमा पवार, तुषार कोहोकडे, गणेश गव्हाड, विशाल कारखिले, प्रा. हाडके, राहुल भागवत, शितल शर्मा, जाधव आजी, ताई हाडवले, सारिका नागवडे यांच्यासह शिवप्रेमी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत सोहळ्यात बोलताना यात्रेचे संयोजक शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर आणि इतिहासाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा आणि समाधीस्थळ असलेल्या पाचाड या ठिकाणांना प्रत्येकाने भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या, शिरूर शहरात सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक ऐक्य, संस्कार आणि आदर्शांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार समाजघडणीचे कार्य व्हावे. पुढील वर्षी या अभिवादन यात्रेचे स्वागत शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानाजवळ करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.सभापती स्वाती घावटे, सभापती डॉ. सुनीता पोटे,नगरसेवक उमेश शेळके, प्रा. डॉ. राजेराम घावटे आणि जाधव आजी यांनीही मनोगते व्यक्त करून जिजाऊंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या गणेश देशमुख यांनी केले, तर आभार गणेश देशमुख यांनी मानले.

राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर घडविणाऱ्या या अभिवादन यात्रेच्या स्वागताने शिरूरमध्ये शिवप्रेमी आणि जिजाऊ भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button