Uncategorized

शिरूरच्या अंगणवाड्यांतील पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांची अचानक पाहणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर शहरातील अंगणवाड्यांमधील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी संबंधित अंगणवाड्यांना अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, मुदत संपलेले मसाले वापरल्याचा संशय आणि अन्न तयार करण्यातील निष्काळजीपणा आढळून आल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

नगराध्यक्ष पाचर्णे यांनी पोषण आहार तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया तपासून पाहिली. यावेळी स्वयंपाकघरातील स्वच्छतेचा अभाव, अन्नसाहित्याची अयोग्य साठवण आणि मुदत संपलेल्या मसाल्यांचा वापर होत असल्याची बाब निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बालकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी सांगितले की शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासनाच्या दिलेल्या निकषानुसार पोषण आहार मुलांना मिळणे आवश्यक आहे. शिरूर येथील अंगणवाड्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार संदर्भात व त्यातील गुणवत्तेच्या संदर्भात या यंत्रणेच्या पुणे येथील अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सोमवार दिनांक 13 जुलै रोजी अंगणवाडी सेविकांची बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनीही शालेय पोषण आहारा संदर्भातील पुणे येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी नगरसेवक सागर नरवडे यांनी केली.

भविष्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेची नियमित तपासणी करून बालकांना दर्जेदार व पौष्टिक आहार मिळेल, याची खात्री करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.

या पाहणीवेळी नगरसेविका सुनिता भुजबळ, उपसभापती स्वप्नाली जामदार, सभापती स्वाती साठे, नगरसेविका संगीता मल्लाव, आदी उपस्थित होते.

शिरूर शहरात दहा अंगणवाड्या असून शंभरहून अधिक विद्यार्थी त्यामध्ये आहे. या विदयार्थ्यांना पोषण आहार म्हणून खिचडी, लापशी,बिस्किटे दिली जातात.

पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे यांनीही बालकाना गुणवत्तापूर्ण आहार मिळाला पाहिजे व या संदर्भामध्ये हलगर्जी पणा करणाऱ्यांनावर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button