राष्ट्रीय

शिरूर तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२4}यंदाच्या मान्सूनने शिरूर तालुक्यात दमदार हजेरी लावली असून ८ जुलै २०२६ पर्यंत तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. तालुक्याचे सरासरी (नॉर्मल) पर्जन्यमान ७२.५ मिमी असताना प्रत्यक्षात १४५ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे.त्याच बरोबर  चिंचणी  येथील घोड धरणात ०•६ टीएमसी पाणी आले  असल्याचे शाखा अभियंता वैभव काळे यांनी सांगितले.

दरम्यान तळेगाव – न्हावरा रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिर गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवगण फराटा येथील कानगाव, ता. दौडला जोडणारा पुल ही पाण्याखाली गेला आहे. शिरूर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या घोडनदी वरील हत्तीडोह बंधारा ही पाण्याने तुडुंब भरला गेला आहे. त्याच बरोबर वडगाव रसाई नांगरगावला जोडणारा रस्ता व सादल गाव येथील हातवळण बंधारावर पाणी आल्याने येथील रस्त्या बंद करण्यात आला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे . मांडवगण फराट्यातील फराटवाडी येथील पूल पाण्याखाली गेला होता परंतु सद्यस्थितीत त्या पुलावरील वाहतूक सुरू आहे. सादलगाव येथील झोपड्यांमध्ये पाणी शिरले तर एका पत्राशेड  गोठ्याचे नुकसान झाले आहे. मुखई येथील दोन के.टी .बंधाऱ्यावरील पूल व जातेगाव बुद्रुक व  जातेगांव खुर्द येथील पुलावर पाणी आल्याने या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात  आलेली आहे. टोकाची वाडी येथील ठाकर वस्तीवरील 26 कुटुंबातील 59 जणांचे अस्मिता भवन येथे स्थानांतर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून शिरूर तालुक्यातील विविध गावात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात माहितीचे  संकलन सुरू करण्यात आले असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

शिरूरच्या कृषि खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सर्कलनिहाय आकडेवारीत तळेगाव सर्कलमध्ये सर्वाधिक २३३ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ३२१.४ टक्के आहे. त्याखालोखाल पाबळमध्ये २२९.३ मिमी (३१६.३ टक्के), कोरेगावमध्ये १८१ मिमी (२४९.७ टक्के) आणि टाकळीमध्ये १५५.६ मिमी (२१४.६ टक्के) पाऊस नोंदविला गेला.

याउलट मलठण आणि रांजणगाव या सर्कलमध्ये प्रत्येकी ७७.१ मिमी पाऊस झाला असून तो तालुक्यातील सर्वात कमी आहे. तसेच शिरूर शहरात १२२.७ मिमी, न्हावरा व निमोणे येथे प्रत्येकी १३४.८ मिमी, तर वडगाव रासाई मध्ये १०३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी साचणे व रस्त्यांवर चिखलाची समस्या निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकरी आणि प्रशासन सतर्क आहे.

फोटो ओळी – पावसामुळे  चिंचणी येथील घोड धरणाच्या  पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button