Uncategorized

प्रशासनाच्या आश्वासनानंतर महिबूब सय्यद यांचे आमरण उपोषण मागे

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: विविध नागरी प्रश्न, कथित अनियमितता आणि ठेक्यावरील सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शनिवारी मागे घेण्यात आले.

उपोषणादरम्यान प्रशासनाकडून किमान वेतन आयोगाच्या नियमानुसार ठेक्यावरील सफाई कामगारांना तत्काळ वेतन लागू करण्याची कार्यवाही, स्वच्छता निरीक्षकांची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत वैद्यकीय तपासणी, गौण खनिज उत्खनन प्रकरणी साई गणेश ठेकेदार संस्थेला बजावण्यात आलेल्या ८८ लाख रुपयांच्या दंडाबाबत पुढील कार्यवाही, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई, तसेच खतखड्डा विल्हेवाट प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

याशिवाय, ठेक्यावरील सफाई कामगारांना शासनाच्या ‘श्रमसाफल्य’ योजनेअंतर्गत मोफत घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आल्याचे महिबूब सय्यद यांनी सांगितले.

महेश चोबे, सहाय्यक आयुक्त तसेच राज्यमंत्री दर्जाचे राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर महिबूब सय्यद यांनी आपले आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.

यावेळी मुख्याधिकारी प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष मितेश गदिया, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप, आदित्य मैड, रवि लेंडे यांच्यासह ठेका सफाई कामगार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button