Uncategorizedलेखसंपादकीय

विचारांची ज्योत तेवत ठेवणारा ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’

शहराचा विकास मोजताना आपण रस्ते, इमारती, उद्योग, पायाभूत सुविधा यांचा विचार करतो. मात्र, शहराच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो तो तेथील नागरिकांच्या वैचारिक समृद्धीतून. विविध क्षेत्रांतील माणसे एकत्र येतात, अनुभवांची देवाणघेवाण करतात, प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा करतात आणि नव्या पिढीला प्रेरणा देतात, तेव्हा शहराचे सामाजिक विश्व अधिक समृद्ध होत जाते. शिरूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’ हा याच वैचारिक समृद्धीचा अनुभव देणारा उपक्रम ठरला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि शिरूरचे सुपुत्र किशोरराजे निंबाळकर यांच्या पुढाकारातून ऑगस्ट २०२४ मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्यांच्या धावपळीतही वैचारिक संवादासाठी वेळ काढत विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आज शिरूरच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणारी ही बैठक म्हणजे केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम नाही. येथे अनुभव बोलतात, प्रश्न उपस्थित होतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि अनेकदा नव्या दिशांचा शोध घेतला जातो. प्रशासन, शिक्षण, साहित्य, इतिहास, उद्योग, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कार्य, ग्रामविकास, सहकार अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या मंचावर संवाद साधल्याने त्याचा आवाकाही सातत्याने विस्तारला आहे.

गेल्या दोन वर्षांत संयुक्त राष्ट्रसंघात अधिकारी म्हणून कार्य केलेले डॉ. शिरीष रावण, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य व माजी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, ‘वेंगुर्ला पॅटर्न’चे जनक रामदास कोकरे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, असीम फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी, पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे, डेप्युटी कमिशनर व लेखक राजीव नंदकर, पद्मश्री सरपंच पोपटराव पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आदरणीय किशोर राजे निंबाळकर तथा अध्यक्ष सॅटर्डे सन साईन क्लब

उद्योजक एन. बी. धुमाळ, साहित्यिक डॉ. शाळीग्राम भंडारी, इतिहास अभ्यासक डॉ. पद्माकर प्रभुणे, प्रा. नरेश बोडखे, ॲड. अशोक पलांडे, साहित्यिक संजय कळमकर, माजी सनदी अधिकारी जीवन सोनवणे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य नंदकुमार निकम, सीए चकोर गांधी, लेखक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दत्ता कोहीनकर, कर्नल साहेबराव शेळके, कंपनी सेक्रेटरी पवन चरेजा, प्रिया लंघे, सुहास फडके आणि डॉ. राजेश दाते यांसारख्या मान्यवरांनी या मंचावरून आपले अनुभव मांडले.

या संवादांमधून मिळालेली माहिती ही केवळ ऐकण्यापुरती मर्यादित राहिली नाही. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रवासातून संघर्ष, यश, अपयश, सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील आव्हाने यांचा वेध घेण्याची संधी शिरूरकरांना मिळाली. विशेषतः तरुणांसाठी अशा व्यक्तिमत्त्वांशी थेट संवाद साधण्याची संधी ही प्रेरणादायी ठरते.

आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगभरातील माहिती क्षणात हाताशी येते. सोशल मीडियामुळे संवादाची साधने वाढली; मात्र प्रत्यक्ष संवादाची उब काही प्रमाणात कमी होताना दिसते. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष भेट, मुक्त चर्चा आणि वैचारिक देवाणघेवाण यांना महत्त्व देणारा हा उपक्रम वेगळा ठरतो. मतभिन्नता असली तरी समोरच्या विचारांचा आदर करीत संवाद साधण्याची संस्कृती रुजवणे, हा या उपक्रमाचा गाभा आहे.

वैचारिक प्रवासाचे दस्तऐवजीकरण

१५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’चा द्वितीय वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने गेल्या दोन वर्षांच्या वैचारिक प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणारा विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे. क्लबच्या माध्यमातून शिरूरमध्ये आलेल्या मान्यवरांचे विचार, अनुभव आणि विविध विषयांवरील मार्गदर्शन पुढील पिढीसाठी जतन करण्याचा हा प्रयत्न आहे.

या विशेषांकाचे प्रकाशन संत तुकाराम महाराजांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होत आहे. समाज, संस्कृती, संतपरंपरा आणि समकालीन विचारांचा सखोल अभ्यास असलेल्या डॉ. मोरे यांच्या उपस्थितीमुळे वर्धापनदिनाला वैचारिक अधिष्ठान लाभणार आहे.

संवादातून समाजाला दिशा

‘सनशाईन सॅटर्डे क्लब’ची खरी ताकद त्याच्या नियमिततेत आहे. एका कार्यक्रमापुरता उत्साह न ठेवता दर महिन्याला संवादाची परंपरा सुरू ठेवणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या प्रवासामागे किशोरराजे निंबाळकर यांचे सातत्यपूर्ण योगदान आणि वैचारिक अधिष्ठान महत्त्वाचे ठरले आहे. विशेषांकाच्या निर्मितीसाठी नितीन प्रवीण भंडारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

शहराची सामाजिक श्रीमंती केवळ भौतिक विकासाने वाढत नाही. विचारशील नागरिक, संवेदनशील समाज आणि संवादाची संस्कृती यांचीही तितकीच गरज असते. ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’ने गेल्या दोन वर्षांत याच दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

दोन वर्षांपूर्वी पेरलेले विचारांचे हे बीज आता रुजले आहे. त्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची, तरुणाईला या संवादप्रवाहात सहभागी करून घेण्याची आणि शिरूरची ओळख केवळ विकसित शहर म्हणून नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण करणारे, अनुभवांचा सन्मान करणारे आणि नव्या पिढीला दिशा देणारे शहर म्हणून निर्माण करण्याची गरज आहे.

कारण विचारांची ज्योत तेवत राहिली, तर समाजाचा प्रवास केवळ विकासाकडे नव्हे, तर विवेकाकडेही होतो. ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’ची दोन वर्षांची वाटचाल याच आशावादी प्रवासाची साक्ष देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button