महाराष्ट्रराजकीय
शिरूर बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू ; पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल नाही, मात्र ५८ उमेदवारी अर्ज नेले
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ५ जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी (२९ मे) एकही अर्ज दाखल झाला नसला, तरी तब्बल ५८ उमेदवारी अर्ज इच्छुकांनी नेल्याने निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकारी संस्था, शिरूर) हरिश्चंद्र कांबळे यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला.
या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी-आडते मतदारसंघातून २ आणि हमाल-मापाडी मतदारसंघातून १ अशा एकूण १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १ हजार रुपये, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्राची किंमत २०० रुपये राहणार आहे.
राखीव जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाचा दाखलाही जोडावा लागणार आहे.

उमेदवार हा बाजार समिती कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक असून, किमान १० गुंठे क्षेत्राचा ७/१२ उतारा तसेच शेतकरी असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृह क्रमांक १ येथे पार पडणार आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत २९ मे ते ४ जून २०२६ अशी असून, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ५ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर ८ जून रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ८ जून ते २२ जूनपर्यंत राहणार असून, २३ जून रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून चिन्हवाटप करण्यात येणार आहे.
५ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
