क्राईम

परवानगीशिवाय कालवा फोडून पाणी वळविल्याचा आरोप; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल.

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}.पाटबंधारे विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कालवा फोडून पाण्याचा प्रवाह बदलत अनधिकृतरित्या सिंचनासाठी पाणी वापरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुशांत अशोक शेलार (रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 651/2026 दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 326(ब), 324(5), महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 चे कलम 93 तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्राजक्ता विठ्ठल वाठे (वय 29), कालवा निरीक्षक, पाटबंधारे उपविभाग, शिरूर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी वडगाव रासाई गावच्या हद्दीत आरोपीने पाटबंधारे विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन सायफन करून कालवा फोडला. त्यामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह बदलून सिंचन व्यवस्थेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच अनधिकृतरीत्या कालव्याचे पाणी वापरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे शासनाचे सुमारे 1 लाख 31 हजार 750 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी 15 जुलै रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार गवळी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button