शिरूर{डेली न्यूज पोस्ट टीम- 24}: गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर तहसील कार्यालय परिसरातील जुन्या इमारतीतून सुरू असलेले शिरूर पोलीस ठाण्याचे कामकाज आता नव्या, प्रशस्त आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त इमारतीतून होणार आहे.
स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट २०२६ पासून शिरूर पोलीस ठाण्याचे नियमित कामकाज नवीन इमारतीतून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर प्रशासकीय तसेच पोलिसांचे नियमित कामकाज याच वास्तूतून सुरू होईल.
नवीन पोलीस ठाण्याची इमारत शिरूर बसस्थानकाच्या शेजारी असल्याने नागरिकांसाठी हे ठिकाण अधिक सोयीचे ठरणार आहे. तक्रारी, अर्ज, गुन्ह्यांची नोंद, पोलीस परवानगी, हरविलेल्या वस्तू अथवा कागदपत्रांबाबतची माहिती तसेच विविध पोलीस सेवांसाठी नागरिकांना अधिक सुलभपणे पोलीस ठाण्याशी संपर्क साधता येणार आहे.
नवीन इमारतीतून शिरूर शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध, गुन्ह्यांचा तपास, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, बंदोबस्त नियोजन आणि इतर सर्व पोलीसविषयक कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज व तक्रारी स्वीकारणे, हरविलेल्या वस्तू अथवा कागदपत्रांबाबत नोंद घेणे, विविध पोलीस परवानगीसंबंधी अर्ज तसेच इतर समस्यांवर आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी व्यवस्था राहणार आहे. तक्रारीनुसार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया, गुन्ह्यांच्या कागदपत्रांची नोंद व पुढील कायदेशीर कार्यवाहीही नव्या पोलीस ठाण्यातून केली जाणार आहे.
दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी करण्यासाठी आरोपींचा शोध, पुरावे संकलन, पंचनामे, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हे तपासाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
शिरूर शहरातील संवेदनशील ठिकाणे, सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका, सभा व आंदोलने यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येणार आहे. नियमित पेट्रोलिंग वाढवून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
शहरातील वाढती वाहतूक, वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे, नो-पार्किंग क्षेत्रे तसेच अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांवरही पोलीस यंत्रणा लक्ष केंद्रित करणार आहे. पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.






