धार्मिंकराष्ट्रीय

शिरूरमध्ये भक्तीचा महासागर; पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या नम्रतेचा संदेश

कथेचा आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी तिसरा दिवस

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: “नम्रपणे, सभ्यतेने आणि एकत्रितपणे जीवन जगा,” असे हृदयस्पर्शी आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांनी केले. त्यांच्या अमृतवाणीमधून सुरू असलेल्या श्री शिव महापुराण कथेने शिरूर परिसरात अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला आहे.

दि. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत हा अध्यात्मिक सोहळा रंगत असून आज कथेचा तिसरा दिवस उत्साहात पार पडला. रामलिंग रोडवरील कार्यक्रम स्थळी जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

नम्रतेचा मंत्र, संस्कारांचा संदेश

कथेदरम्यान मिश्रा यांनी नम्रतेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “दिखाऊपणा न करता जगा. सन्मान करणारेही आपलेच असतात आणि अपमान करणारेही आपलेच असतात. आपल्या कडे कितीही धन, ज्ञान असू द्या; पण नम्रता नसेल तर ते अपूर्ण आहे.”

ते पुढे म्हणाले, “मुलांना सी.ए., इंजिनिअर बनवण्यासाठी क्लास लावावे लागतात; पण मोबाईल वापरायला ते आपोआप शिकतात. मुलांना वर्षातून काही दिवस आजी-आजोबा, नाना-नानी यांच्याकडे पाठवा. त्यांच्या जीवनानुभवातूनच खरे संस्कार मिळतात.”

विनम्रता, संगत आणि सभ्यता या जीवनातील मूलभूत मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश त्यांनी दिला.

भव्य नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन पी. आर. धारीवाल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. सुमारे ३० एकरांहून अधिक जागेवर उभारण्यात आलेला भव्य व सुसज्ज मंडप सध्या भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

मुख्य मंडपासोबतच प्रसादासाठी स्वतंत्र, सुसज्ज प्रसादलय उभारण्यात आले आहे. भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, आदित्य धारीवाल, साक्षी धारीवाल, दिनाभाभी धारीवाल यांच्यासह उज्ज्वला लुंकड, सुरेखा चोपडा, कल्पना लुणावत आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण

शिरूर शहरात प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असल्याने अवघा परिसर शिवनामाच्या गजरात न्हाऊन निघाला आहे. भव्य सजावट, भक्तीमय वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रत्येक भाविकाला एक आगळावेगळा आध्यात्मिक अनुभव लाभत आहे.

श्री शिव महापुराण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. नम्रता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यामुळे शिरूरमध्ये भक्तीची ज्योत अधिक प्रखरतेने प्रज्वलित झाली आहे.हर हर महादेव!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button