गुन्हेगारी

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; साडेतीन लाखांचे १५ गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२४}रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसरातील आठवडे बाजार तसेच प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे तब्बल १५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या अनपेक्षित भेटीमुळे संबंधित नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी गहाळ मोबाईलचा तांत्रिक तपास करून ते शोधून काढण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी गहाळ मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून ट्रेसिंगचे काम सुरू केले.

या प्रयत्नांतून सन २०२५ पासून आतापर्यंत गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व मोबाईल शनिवारी (४ जुलै) पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले.

गहाळ झालेला मोबाईल पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी सोडून दिली होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल शोधून परत दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी ही पोलीस ठाण्याकडून मिळालेली ‘सरप्राईज गिफ्ट’ असल्याची भावना व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार शिरूर) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी केली. दरम्यान, गहाळ झालेल्या इतर मोबाईलचाही शोध सुरू असून तेही लवकरच संबंधित मालकांना परत करण्यात येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button