महाराष्ट्र

शिरूर नगरपरिषद सफाईच्या ठेक्या वरील कामगारांच्या किमान वेतनाच्या मुद्दा ऐरणीवर. उपोषणकर्ते महिबूब सय्यद यांची राज्य शासनाच्या किमान वेतन आयोग सल्लागार समितीचे अध्यक्ष गणेश ताठे यांनी घेतली भेट

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर नगरपरिषदेतील ठेक्यावरील सफाई कामगारांना शासनाच्या किमान वेतन आयोगानुसार वेतन मिळणे बंधनकारक असून त्याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील  अशी माहिती राज्य शासनाच्या किमान वेतन आयोग सल्लागार समितीचे अध्यक्ष गणेश ताठे यांनी दिली. दरम्यान, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांच्या आमरण उपोषणाला ठेका सफाई कामगारांचा वाढता पाठिंबा मिळत असून किमान वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिबूब सय्यद हे १३ जुलैपासून शिरूर नगरपरिषदेसमोर कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि विविध नागरी समस्यांविरोधात आमरण उपोषण करत आहेत. बुधवारी गणेश ताठे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सय्यद यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हा कामगार अधिकारी गिते आणि मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्याशी संपर्क साधून ठेक्यावरील कामगारांना किमान वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन देण्याबाबत सूचना केल्याचे सांगितले.

मंगळवारी घंटागाडी विभागातील पुरुष कामगारांनी उपोषणाला पाठिंबा दिल्यानंतर बुधवारी महिला ठेका सफाई कामगारांनीही उपोषणस्थळी उपस्थित राहत आंदोलनात सहभाग नोंदविला. कामगारांनी किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करणे, थकीत वेतन अदा करणे, दर महिन्याचे वेतन १५ तारखेपूर्वी देणे आणि कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली. सध्या किमान वेतनानुसार पगार मिळत नसल्याने तसेच वेतन वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

उपोषणाद्वारे सय्यद यांनी नगरपरिषदेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी, निविदेशिवाय कचऱ्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई, सफाई कामगारांना ‘श्रमसाफल्य’ योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे, गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंड वसूल करणे, किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे आणि शहरातील धोकादायक विद्युत वाहिन्या हटविणे आदी मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.

आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून कोणत्याही ठेका कामगारावर कारवाई अथवा त्यांना सेवेतून कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महिबूब सय्यद यांनी दिला. या प्रश्नावर मंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, ‘आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे रवींद्र सानप, मनसेचे रवि लेंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button